अमरावती - येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येऊ नये, यासाठी पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे. तसेच चार महिने पुरेल असा पाणीपुरवठा होण्यासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. मंत्री बच्चू कडूंनी सिंचन भवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी जलसंपदा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता अनिल बहादुरे, अ. ल. पाठक, अधिक्षक अभियंत आशिष देवगडे, रश्मी देशमुख, नरेंद्र तायडे उपस्थित होते.
पाणी पुरवठा आराखडा तयार करा -
जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील 32 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रातूनच या गावांना पाणी पुरवठा करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश बच्चू कडूंनी दिले. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव, खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाचे दोन हजार कोटी खर्च होणे आहेत, याबाबत प्रस्ताव सादर करावा. यात बुलडाणा येथील भूसंपादन प्रक्रियेस प्राधान्य देण्यात यावे. भूसंपादन आणि पुनर्वसन याबाबींवर 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. प्रकल्प वेळेत आणि वेगाने पुर्ण व्हावेत, यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, या प्रस्तावित कामाचा शासनाकडे पाठपुरावा करावा, संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारींचा निपटारा करावा, भूसंपादनाबाबत लवचिकता नसावी, या तक्रारींचे निवारण करावे, याबाबत नियमांचे पालन करण्यात यावे, तसेच जिगाव प्रकल्पाच्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण करावे, असे बच्चू कडू म्हणाले.
प्रयोगांचा विचार करा -
सिंचन प्रकल्पांवरून केवळ सिंचनखाली क्षेत्र आणणे हे एकमेव उद्दिष्ट ठेऊ नये. यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणल्या जाऊ शकतात. कालव्यावर सोलरचा प्रयोग, प्रकल्पावरील रिकाम्या जागांचा पर्यटनासाठी विकास, उद्योगासाठी जागेचा उपयोग करणे, कालव्याशेजारी वृक्ष लागवड केल्यास त्यातून शेतकऱ्यांना लाभ होईल. तसेच निसर्गोपचार केंद्र सुरू करणे, अशा प्रयोगांचा विचार करावा, असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्र-मध्य प्रदेश बससेवा बंद, शिवराज सिंह यांनी घेतला निर्णय