अमरावती - कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची शेती करताना आपला खर्च कमी करून जैव विविधता जपली पाहिजे. रासायनिक शेती न करता जैविक शेती करून शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात भर पाडावी, असे आवाहन सुधारित कापूस यंत्रणा बीसीआयकडून करण्यात आले आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामधे फवारणीसाठी दशपर्णी अर्क, अमृत पाणी, निंबोळी अर्क, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जीवामृत यांसारखी जैविक औषधे रांगोळीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना दाखवण्यात आली.
कपाशीतील 2 झाडामधील अंतर कमी करून उत्पादन वाढावे, यासाठी फवारणी करताना घ्यायची काळजी याबाबत शेतकऱ्यांना यावेळी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. तर या प्रात्यक्षिकामुळे नक्कीच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.