अमरावती - सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून त्रस्त शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजय नारायण शिंदे(60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शेतकरी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम येथील रहिवासी आहे.
गत तीन वर्षांपासून कोरडा दुष्काळ असल्याने यंदाच्या खरीप हंगामात कशीबशी पेरणी केली होती. मात्र, हातात पिकाऐवजी तणच जास्त आले. तर आर्थिक परिस्थिती नाजूक असताना 95 वर्ष वयाच्या वडिलांचा दवाखान्याच्या खर्चही झेपणे कठीण झाले होते. तसेच कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज वाढत होते. अशा परिस्थितीला कंटाळून गावातील स्मशानालगत निंबाच्या झाडाला गळफास लावून विजय शिंदे यांनी आत्महत्या केली.
त्यांच्या मागे एक मुलगा, दोन विवाहित मुली, वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे सावंगी संगम गावात हळहळ व्यक्त होत आहे.