अमरावती : आपल्या जीवनात आपण जे काही मिळवतो त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आपल्या आई वडिलांचा असतो. त्यामुळेच माझ्या आईने शिक्षण घेतलेला या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची जागा माझ्यासाठी अतिशय पवित्र असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन केल्यावर फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'दशकपूर्ती ही इतिश्री नव्हे एक टप्पा' : 1923 मध्ये स्थापन झालेल्या किंग एडवर्ड कॉलेजचे देशाच्या स्वातंत्र्यानंतर शासकीय विदर्भ महाविद्यालय असे नामकरण झाले. आज विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या नावाने हे कॉलेज संपूर्ण विदर्भात ओळखले जाते. महाविद्यालयाच्या काळात उभारण्यात आलेल्या भिंती या अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार आहेत. आज दशकपूर्ती साजरी करत असताना भविष्यकाळातील वाटचाल देखील अतिशय महत्त्वाची आहे याची जाणीव असायला हवी. एखादा व्यक्ती 100 वर्षाचा होतो तेव्हा त्याच्या जीवनाची इती श्री होते. मात्र विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची ही इती श्री नाही तर हा एक टप्पा आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
'एकल विद्यापीठासाठी सरकार सदैव पाठीशी' : शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला. संस्थेच्या विकासासाठी शासनाने 25 कोटी रुपये दिले. मात्र यावर समाधान मानणे योग्य नाही. आता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची वाटचाली एकल विद्यापीठाच्या दिशेने व्हायला हवी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब या ठिकाणी व्हायला हवा. अत्याधुनिक वर्ग खोल्या, ग्रंथालय तसेच वस्तीगृह या ठिकाणी निर्माण व्हावेत. एकल विद्यापीठाकडे वाटचाल करताना शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या पाठीशी सरकार ठाम उभे राहील, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
'भविष्यात मानव संसाधनाला महत्त्व' : फडणवीस पुढे म्हणाले की, 'भारतातील 57 टक्के लोकसंख्या ही युवा आहे. मानव संसाधनेच्या बळावर अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांनी अफाट विकास साधला. आज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी केलेल्या भाकिताप्रमाणे भारत देखील जगात प्रचंड प्रगती करीत आहे. आज जगातील पाचवी मोठी अर्थसत्ता अशी भारताची ओळख आहे. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केले त्यांच्यापेक्षा आज आपली अर्थव्यवस्था सशक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या मातृभाषेतच अभियांत्रिकी वैद्यकीय शाखेचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. चीन जपान जर्मनी फ्रान्स या ठिकाणी त्यांच्या मातृभाषेतच शिक्षणाची व्यवस्था आहे. मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे हे चारही देश प्रचंड प्रगत झाले आहेत'.
'अनेक मोठे उद्योग अमरावतीत येणार' : 'आज अमरावतीत टेक्स्टाईल पार्क विकसित होत आहे. दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही अमरावतीत टेक्स्टाईल क्षेत्रात करीत आहोत. देशातील टेक्स्टाईल क्षेत्रातील अनेक मोठे उद्योग अमरावतीत येण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेने आपल्या शतकपूर्ती काळात उद्योग क्षेत्राचा विकास होईल असे नवीन अभ्यासक्रम तयार करायला हवेत. संशोधनावर भर द्यावा', असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.