अमरावती - यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, मूग, उडिदासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने नुकसान होऊन तब्बल दोन महिने उलटल्यानंतर आता केंद्रीय पथक राज्यात पाच दिवसांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहे. या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील नुकसानीची पथक पाहणी करत आहे. मात्र, मागील वर्षी केंद्रीय पथकाने ज्या गावात नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळाली? याची सत्यता तपासणारा हा विशेष अहवाल.
यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मागील वर्षीदेखील असेच नुकसान झाले होते. म्हणून नुकसान झाल्यानंतर तब्बल १ महिन्यांनी केंद्रीय पथक अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील काही गावांतील नुकसानीची पाहणी केली. या गावांपैकी एक गाव म्हणजे दाभा बडनेरावरून तीन किलोमीटरवर असलेल्या दाभा गावातील रस्त्या लगतच्या शेतामध्ये या केंद्रीय पथकाने भेट दिली होती. तेव्हा केंद्रीय पथकासोबत अख्खे जिल्हा प्रशासनदेखील उपस्थित होते. या पथकाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या पिकांची पाहणी केली. एका शेतकऱ्याच्या गोडाऊनमध्ये जाऊन खराब झालेल्या सोयाबीनची पाहणी केली. त्यानंतर आता भरघोस मदत मिळेल, अशी आशा या गावातील शेतकऱ्यांना होती. पण, एक वर्ष उलटले दुसरे केंद्रीय पथक राज्यात आले, पण मागील वर्षीच्याच नुकसानीची कवडीचीही मदत केंद्रीय पथक आल्यानंतरही मिळाली नाही. त्यामुळे हे पथक फक्त पर्यटन करायला येते का? असा प्रश्न दाभा या गावातील शेतकऱ्यांनी विचारला आहे.
एक वर्ष उलटले पण कवडीचीही मदत मिळाली नाही -
या गावातील शेतकरी एकनाथ गिरसपुंजे सांगतात मागील वर्षी परतीच्या पावसाने माझे ९० टक्के सोयाबीन खराब झाले होते. त्यानंतर कपाशीसह आदी सर्व पिकांचे नुकसान या पावसाने झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी केंद्रीय पथक येणार आहे, हे माहिती पडले. त्यामुळे आम्ही आनंदी झालो होतो. आम्हाला वाटले की, आता केंद्रीय पथक येत असल्याने भरघोस मदत मिळेल. त्यांनी माझ्या गोडावूनमधील सोयाबीनची पाहणी केली होती. पण, आता एक वर्ष उलटले, पण कवडीचीही मदत आम्हाला अजूनपर्यंत मिळाली नाही. आता पुन्हा राज्यात पथक आले आहे. मागील वर्षीचेच पैसे अजून मिळाले नाही, मग हे पथक येते कशासाठी? फक्त लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यासाठी येते का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
आमच्या पैशावर मौज मजा -
याच दाभा गावातील शेतकरी महेंद्र गायखोर सांगतात, जे केंद्रीय पथक एक वर्षांपूर्वी २२ नोव्हेंबरला येऊन गेले होते. त्या पथकाने गावातील शेत, गोडावूनची पाहणी केली होती. परंतु, एक वर्ष उलटून थोडीही आर्थिक मदत मिळाली नाही. यंदाही राज्यात हे पथक आले आहे. हे पथक आता नेहमी येऊन काय करणार आहे?. जेवढे नुकसान झाले, तेवढी मदत दिलीच पाहिजे असे आमचे म्हणणे नाही. पण, थोडी तरी मदत देणे गरजेचे आहे. हा पैसा आमचा आहे आणि आमच्या पैशावर हे केंद्रीय पथक मौज मजा मारायला येते का? याचे उत्तर मोदी सरकार देणार का?