अमरावती - मंगळवारी पहाटे भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून दहशतवाद्यांना धडा शिकवला. या घटनेनंतर शहरात जल्लोष करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांसह फटाक्यांची आतषबाजी केली.
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने ४० पेक्षा जास्त जणांना वीरमरण आले होते. या घटनेमुळे देशभर पाकिस्तान आणि पाकिस्तानप्रणित दहशतवाद्यांविरोधात रोष उफाळून आला होता. यामुळे भारतीय वायुसेनेने मंगळवारी पहाटे दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केली. यानंतर शहरातील राजकमल चौक येथे युवा स्वाभिमान पक्षाने ढोलताशे वाजवून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. यानंतर सायंकाळी ६ वाजता भाजपच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. ढोल ताशांच्या नादावर कार्यकर्त्यांनी ताल धरला.
या जल्लोषात महापौर संजय नरवणे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत देहणकर, पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, नगरसेवक अजय सारस्कार, चांदेकांत बोमरे, प्रणित सोनी, सुरेख लुंगारे, सूचिता भिरे, प्रणय कुळकर्णी, शिल्पा पाचघरे, लखन राज, मीना पाठक, प्रा. रवींद्र खांडेकर आदी उपस्थित होते.