अमरावती - जिल्ह्यात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ आहे. पाणी प्रश्नासंदर्भात खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह जिल्हापरिषदे, ग्रामपंचायतींचे अनेक सदस्य आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील टेब्रुसोनडा, नागापूर, मोगर्डा, टेलघाट,मोरपाटी, रुईपठार, तेंब्रू, सावरपानी या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या प्रस्तावावर अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला.धारणी तालुक्यातील चौराकुंड येथील ठक्करबाप्पा योजनेचा निधी संपला आहे.चित्री गावतही पाण्याची भीषण स्थिती आहे, असे बैठकीत समोर आले.
अमरावती तालुक्यात ब्राम्हणवाडा गोविंदपूर या गावात दोन मुलं पाण्यासाठी विहिरीत उतरले आणि त्यांनी प्राण गमाविले मात्र प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नसल्याचा आरोप करीत काँग्रेसचे प्रकाश साबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विहिरीतीला गाळ उपसला असता तर ही दुर्घटना टाळली असती असे प्रकाश साबळे यांचे म्हणणे होते.
शासनाच्या नियमानुसार 200 फुटांपर्यंतच बोर खोडता येते. 200 फुटांवर पाणी लागलं नाही तर पैसे वेळ वाया जातो त्यामुळे बोर ही 300 फुटांपर्यंत खोदण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गुरुदेवनगर येथे पाणी नाही. सरपंच, उपसरपंच, सचिव जाब द्यायला समोर येत नाही अशी तक्रार संजय देशमुख यांनी बैठकीत केली. पाणीपट्टी भरली नसल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याचा तक्रारी बैठकीत समोर येताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आरोपांचे खंडन करून शासनाने जिल्ह्यातील 4 कोटी रुपयांची भाडेपट्टी माफ केली. ती रक्कमही जमा केली अशी माहिती यावेळी दिली.
स्तरगाव पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी गावातील प्रत्येक घराने 190 ते 200 रुपये पाणी पट्टी भरणे आवश्यक असून त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आम्हाला हवा असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हापरिषदेचे अधिकारी जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा कंत्राटदारांना महत्व देतात रात्री कंत्राटदारांसोबत दारू पितात अशी तक्रार आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.
बैठकीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक अडचणी दूर करून पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत राबविण्याचे आदेश संबंधितांना दिल्या.खासदार नवनीत राणा यांनीही जिल्ह्यातील पाणी प्रश्न हा आपल्या परिवाराचा प्रश आहे असे समजून त्यांचे निवारण करा. जे काही कागदपत्र हवेत त्यासाठी जिल्हापरिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घ्या, असे नवनीत राणा म्हणल्या.