अमरावती- कारगिल दिनानिमित्त शुक्रवारी अमरावती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने ई-ऑरबीट येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नी आणि वीर वडिलांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
या सोहळ्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी देशातील नागरिकांनी प्रामाणिक वर्तन ठेवावे. तसेच आपल्या कर्तव्यांचे योग्यपणे पालन करत आपल्या संरक्षणासाठी सीमेवर सज्ज असणाऱ्या सैनिकांप्रति आदर बाळगण्याचे आवाहन केले. फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित होते. कारगिल दिनानिमित्त ई-ऑरबीटच्या तिन्ही स्क्रीनवर उरी हा सिनेमा विद्यार्थी आणि आजी-माजी सैनिकांना दाखविण्यात आला.