अकोला - जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून, शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा निधी वळविला. कडू यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून यंत्रणांचा यासाठी उपयोग केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज केला आहे.
हेही वाचा - Minor Girl Abuse : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सोशल मीडियावरील चॅटिंगमधून घडला प्रकार
बोगस कागदपत्र तयार केल्याची पोलीस तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असल्याची माहिती पुंडकर यांनी दिली.
अकोला जिल्हा नियोजन समितीने वार्षीक आराखडा तयार करताना मागविलेल्या प्रस्तावानुसार, १० मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रस्तावामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने काम बदल करताना जिल्हा परिषद यंंत्रणेची मान्यता घेतली नाही. परस्पर स्वतःच्या लेटर हेडवर कामांमध्ये बदल करण्यात आला. काम बदल करण्याचा अधिकार जिल्हा नियोजन समितीला नाही, असे असतानाही जिल्ह्यातील तीन रस्ते जे मुळात शासनाच्या लेखी अस्तित्वातच नाही व ज्यांना ग्रामीण रस्ते म्हणून शासनाकडून कोणताही क्रमांक दिला नाही, अशा रस्त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियतव्यय मंजूर केला. या कामांचा कार्यारंभ आदेशही काढण्यात आला. जे रस्ते अस्तित्वातच नाही अशा रस्त्यांसाठी निधी मंजूर करून त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश काढणे, काम जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील असताना ते इतर यंत्रणांकडून करून घेण्यासाठी वळती करणे व शासन निधीची अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुंडकर यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सह अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, जि.प. सदस्य पुष्पाताई इंगळे, युवक आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जि.प. सदस्य शंकरराव इंगेळ, अरुंधती सिरसाट व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या रस्त्यांचा आहे समावेश
१) गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल व पोच मार्गाचे बांधकाम करणे - किंमत ५० लाख
२) इतर जिल्हा मार्ग ११ ला जोडणारा धामणा (ता. जि. अकोला) मुख्य रस्त्या ते नवीन धामणा जोड रस्त्याची सुधारणा करणे - किंमत २० लाख रुपये
३) कुटासा ते पिंपळोद रस्त्यावर कुटासा जवळ लहान पुलाचे बांधकाम करणे. हा ग्रामीण मार्ग असून, त्याला इतर जिल्हा मार्गामध्ये दाखवू निधी वळता केला - किंमत एक कोटी २५ लाख
तक्रार दाखल करण्यासाठी वंचितचा ठाण्यात ठिय्या
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी पोलिसांना तक्रार दाखल करण्यासाठी एक तासांचा वेळ दिला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याने वंचितच्या पदाधिकारी यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पवार, कोतवाली ठाणेदार चंद्रशेखर कडू यांनी पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांना एक पत्रही दिले. पत्र घेतल्यानंतर पदाधिकारी यांनी ठिय्या आंदोलन बंद केले.
हेही वाचा - Schools reopen in Akola : शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा किलबिलाट सुरू; पहिल्या दिवशी कमी प्रतिसाद