अकोला - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन 3 मे नंतर राज्यात कुठलीही अनुचित घटना घडू शकते, असे संकेत दिले होते. त्यामुळे अनुचित घटना घडू नये यासाठी सर्वधर्मसमभाव राखीत राज्यभर शांतता मार्च ( Statewide Shanti March ) काढण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार अकोला शहरातून वंचित बहुजन आघाडीने ( Vanchit Bahujan Aghadi Akola ) आज (रविवारी) राजराजेश्वर मंदिर व मज्जित येथून दर्शन घेत सर्वधर्मसमभाव राखत शांतता मार्च काढला.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, या दृष्टिकोनातून 1 मे ला राज्यभरात शक्य होईल त्या ठिकाणी शांतता मार्च काढण्यात येईल. या शांतता मार्चमध्ये सर्व धर्म जातीचे नागरिक सहभागी होतील आणि अनुचित घटनेला टाळण्यासाठी हा एक वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न राहील, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यानुसार अकोला शहरातील राजराजेश्वर मंदिरापासून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शांतता मार्च काढला. राजेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर हा मार्च मार्गस्थ झाला. त्यानंतर जामा मस्जिद येथे भेट देऊन हा मार्च पुढे जुने शहर स्थित काळा मारोती मंदिर येथे पुजा, राम मंदिर येथे पूजन, रेल्वे स्टेशन जवळील गुरुद्वारा येथे अभिवादन, बस स्टॅंड येथील चर्च येथे प्रार्थना, टिळक चौक येथे जैन मंदिर येथे पूजन करून या मार्चचा समारोप अशोक वाटिका येथे करण्यात आला.