अकोला - तेल्हारा तालुक्यातील होणारा आय.आर.बी. (भारत राखीव बटालियन कॅम्प क्र. ५) शासनाने सिसा उदेगांव, हिंगणा शिवार येथे हलविण्यात आल्यामुळे आमच्या तालुक्यातील होणारा विकास थांबणार आहे. तसेच, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उपलब्ध होणारा रोजगार सुध्दा थांबणार आहे. त्यामुळे, तरूण पिढीवर उपासमारीची वेळ येईल. हे लक्षात घेता, हा कॅम्प संबंधित अधिकाऱ्याने मंजुर केलेल्या पुर्वीच्या तळेगांव वडनेर, मनात्री येथेच कायम ठेवण्यात यावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. असे न झाल्यास, आम्हाला तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न लक्षात घेता जनआंदोलन करावे लागेल असा इशारा देखील यावेळी नागरिकांनी दिला.
तेल्हारा तालुक्यातील आय.आर.बी. ५ कॅम्पला मंजुरी मिळाली होती. कॅम्पला मंजुरी मिळण्यापूर्वी राखीव बटालियन कॅम्पच्या समादेशक व महानिरिक्षक यांनी प्रत्यक्ष जागेवर जावुन पाहणी केली. सकारात्मक अहवाल दिल्यामुळे कॅम्पला मंजुरी मिळाली असता, ऐन वेळी हा कॅम्प दुसरीकडे पळविण्यात आल्यामुळे, मतदार संघातील जनतेवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता नाराज आहे. तरी सदरहु तो कॅम्प परत तेल्हारा तालुक्यात आणला नाही, तर पूर्ण अकोट विधानसभा क्षेत्राच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल. याची पुर्ण जबाबदारी शासनावरच राहील, असा इशारा नागरिकांनी दिला.
याबाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी नागरिकांची बाजू ऐकून घेतली. बटालियन कॅम्प बचाव कृती समितीच्या काही जणांना मुंबई येथे बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.