अकोला - ज्याप्रमाणे राज्य सरकारसाठी पंढरपूर येथे निवडणूक महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे वारकऱ्यांना ही आषाढी एकादशी आणि पंढरपूर येथील विठोबा हा महत्त्वाचा आहे. म्हणून आषाढी वारीसाठी मानाच्या 9 पालख्यांना 500 वारकऱ्यांसोबत पायी वारीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. तसेच छोट्या पालखी मंडळांना दहा व्यक्तींसोबत वाहनाने पंढरपूर येथे जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गेल्या वर्षी पायी वारीत खंड -
गेल्या वर्षी कोरोनाच्या या संकटामुळे लाखो भाविकांच्या या पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली होती. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांचा मोठा सोहळा होत असतो. पांडुरंगाचे लाखो भाविक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यासोबतच राज्यातील लहान मोठ्या पालख्या या पंढरपूर येथे दरवर्षी जात असतात. मात्र, गेल्या एक वर्षांहून अधिक काळ होत आहे तरी अजूनही कोरोनाचे संकट टळताना दिसत नाही. याच संकटाच्या दरम्यान दुसऱ्यांना आषाढी वारी येत आहे. अशा परिस्थितीत यावर्षीतरी वारीमध्ये खंड पडू नये, अशी सर्व वारकरी संप्रदायाची आणि पांडुरंगाच्या भक्तांची भावना आहे.
हेही वाचा - यंदाचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार; वारकरी आणि महाराज मंडळींची भूमिका
यामुळे यावर्षी पायीवारीत खंड पडू नये. राज्य शासनाने हवे ते नियम या वारकऱ्यांसाठी लावावे. सर्व वारकरी त्या नियमांचे पालन करतील. मात्र, आषाढी वारीसाठी मानाच्या 9 पालख्यांना 500 वारकऱ्यांसोबत पायी वारीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. तसेच छोट्या पालखी मंडळांना दहा व्यक्तींसोबत वाहनाने पंढरपूर येथे जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
...त्याचप्रमाणे वारकऱ्यांना आषाढी आणि विठोबा हा महत्त्वाचा -
राज्य सरकार पंढरपूर येथे निवडणूक महत्त्वाची आहे म्हणून तिथे निवडणूक घेते. त्याचप्रमाणे वारकऱ्यांना ही आषाढी एकादशी आणि पंढरपूर येथील विठोबा हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील लाखो वारकऱ्यांचा विचार करून राज्य सरकारने पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना जाण्यास परवानगी द्यावी, असे अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.