अकोला - इतिहासातील पेशवा दुसरा बाजीराव आणि वर्तमानातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वागणूक एकसारखी आहे. पाच वर्षात मुख्यमंत्री हे दुसऱ्या बाजीराव पेशव्या प्रमाणेच वागले आहेत. त्यांनी बहुजन समाज आणि अल्पसंख्याकावर अन्याय केला आहे. कोल्हापूर, सांगली येथे पूरग्रस्तांसाठी काढलेला शासन निर्णय हा त्याच पद्धतीचा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत केला.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या सहा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आलेले माजी खासदार नाना पटोले, स्वराज्य भवन अकोला, येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीला महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारच जबाबदार आहे. पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले मंत्री फक्त मुख्यमंत्र्यांना सेल्फी काढून पाठवयला गेले होते का? असे म्हणत त्यांनी या मंत्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. तर मागील पाच वर्षात या सरकारने फक्त राजेशाही सारखी सत्ता उपभोगली असल्याचा सूतोवाच देखील त्यांनी केला आहे.
पटोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराला देखील शासन जबाबदार असून एका शेतकऱ्याला 84 हजार रुपये जमिनीचा मोबदला मिळतो तर दुसऱ्या शेतकऱ्याला दोन हजार रुपये मोबदला मिळतो या भेदभावाला काय म्हणावे? या शेतकऱ्यांना विष प्राशन करण्यासाठी देखील शासनानेच बाध्य केले आहे. तर काँग्रेसच्या काळात झालेल्या जमीन अधिग्रहण नियमानुसार या संदर्भात कारवाई करणे अपेक्षित आहे.
या घटनेतील एक शेतकरी मेंदूच्या आजाराने बाधीत झाला असून त्याला काँग्रेसकडून 50 हजार रुपयांची मदत जाहीर करतो, शासनाकडून मदत मिळो वा ना मिळो परंतु काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. असा विश्वास देखील नाना पटोले यांनी पत्रकार परिषदे दरम्यान शेतकऱ्यांना दिला.