अहमदनगर - केडगाव येथे नगर-पुणे महामार्गावर एका भरधाव ट्रकने दोन महिलांना चिरडले. यामध्ये शांताबाई काळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर, दुसरी महिला जखमी झाली. या अपघातानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
शांताबाई आणि त्यांच्यासोबत असलेली महिला या दोघी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. त्यावेळी अचानक वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. शांताबाई ट्रक खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात, आमदारांसह तिघे जखमी..
अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी शहराच्या बाहेरून बायपास रस्त्याची निर्मिती केलेली असताना ही वाहने शहरात येतातच कशी, असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. आंदोलनामुळे नगर-पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकची तोडफोड केली. कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक उस्मान कासम सय्यद याला ताब्यात घेतले आहे.