शिर्डी (अहमदनगर) - उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यासह आजूबाजूचे जिल्ह्यातील किरकोळ व्यापारी हा स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केंद्रातील सरकार सर्वोतोपरीने प्रयत्न करीत आहे. केंद्राच्या निर्णयानुसार आत्मनिर्भरतेवर अवलंबुन राहून बदलत्या परिस्थितीला प्रत्येकाला सामोरे जावे लागणार आहे. परंतु, या स्पर्धेच्या युगात मोठ-मोठ्या विदेशी कंपन्या, उद्योगपतींच्या कंपन्यापुढे किरकोळ व्यापारी जगला पाहिजे. यासाठी तुमच्या समस्या केंद्र शासनापर्यंत पोहचविण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी दिले.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्यावतीने कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात उत्तर महाराष्ट्र व्यापार संघटना प्रतिनिधी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. मेळाव्याचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले.
कोयटे म्हणाले, पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणेच भारत देशात मॉल संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांचा भांडाफोड आम्ही व्यापारी महासंघाच्यावतीने करत आहोत. यामुळे ग्राहकांची फसवणूक करून, फसव्या जाहिराती देऊन, छोटे - मोठे किराणा दुकानदार, व्यापारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत.अशाप्रकारे होत असलेल्या अन्यायाबाबत केंद्र शासनाने कायदा करून तो लवकरात लवकर अंमलात आणावा म्हणजे, सामान्य नागरिक हा प्रामाणिकपणे जीवन जगेल आणि व्यापारी, दुकानदार प्रामाणिकपणे सेवा देतील. लोकल ते व्होकल प्रमाणे आत्मनिर्भर भारत अंतर्गत आम्हाला न्याय द्यावा, असेही कोयटे म्हणाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, रिटेल व्यापारी संघटनेचे सचिव सचिन निवगुणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक कैलास ठोळे, केशव भवर, नरेंद्र कुर्लेकर, कोपरगाव महिला महासंघाच्या किरण डागा, किरण दगडे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.