अहमदनगर - आपली बाजू लपवण्यासाठी सातत्याने दरवेळी खोटे बोलावे लागणे, हा 'मल्टीप्ल पर्सनालिटी डिसऑर्डर'चा आजार आहे. दर दिवशी सकाळी चाळीस पैसे मोजून एकाच विषयावर वेगवेगळे आरोप करणे हा त्यातील प्रकार आहे. मला त्यांचा राग नाही तर कीव येते, त्यांनी चांगले उपचार करून घ्यावेत, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नाव न घेता भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना दिला आहे. त्यांनी पक्ष का सोडला हे सर्वश्रुत आहे, असेही चाकणकर यांनी सांगितले. त्या अहमदनगरमध्ये बोलत होत्या.
महेबूब शेख, लंकेवरील आरोपांना दिले उत्तर
महेबूब शेख आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर महिलांबाबत चित्रा वाघ सातत्याने आरोप करत आहेत. या प्रश्नावर माध्यमांनी त्यांना विचारले असता चाकणकर यांनी पुण्याचे भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी मनपा अभियंत्याला केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा हवाला देत चित्रा वाघ यांनी कसे विधान बदलत समर्थन केल्याचे उदाहरण दिले. त्यांना आपण अगोदर काय बोललो आणि नंतर कशी वक्तव्य बदलली हे सांगत त्यांचे नाव न घेता त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. मला त्यांचा राग नाही तर कीव येते, त्यांनी उपचार करून घ्यावेत, असा उपरोधिक टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला.
दोन दिवस जिल्ह्यात परिवार संवाद यात्रा
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सध्या परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष-संघटना बळकट करण्याच्या उद्देशाने परिवार संवाद यात्रा काढण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली असून जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आमदार व पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाहांची घेतली भेट; गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा