अहमदनगर - ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी न लागल्याने आपण नाराज नसल्याचे कर्जत-जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हे सांगतानाच मला मंत्रिपद मिळावे म्हणून वरिष्ठांकडे शब्द टाकलेले कार्यकर्ते आणि मतदारसंघातील मतदार-कार्यकर्ते यांना अपेक्षा होती, की मला मंत्रिपद मिळावे. त्यामुळे काहीजण नाराज असणे साहजिकच आहे, असे सांगण्यासही रोहित पवार विसरले नाहीत.
यावरून मंत्रीपदी वर्णी न लागल्याची खंत त्यांच्याही मनात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आज अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडी निमित्ताने आमदार रोहित पवार नगरमध्ये आले असता, माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज्यात सोमवारी विस्तारित मंत्रिमंडळातील नवनियुक्त सदस्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन करताना नव वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. मंत्री व्हायचे ही प्रत्येक आमदारांची इच्छा असते. मात्र एक आमदार सुद्धा खूप काही काम करू शकतो. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यात जाऊन जे काम सोपवतील, तो आदेश मानून ते काम करू, असेही रोहित यांनी सांगितले.
कर्जत शहरात लागले होते फलक-
निवडणूक होऊन मतमोजणी झाल्यानंतर काही दिवसातच कर्जत-जामखेड शहरात 'नामदार रोहित पवार' 'पालकमंत्री रोहित पवार' या आशयाचे शुभेच्छा फलक झळकले होते. त्यावेळीही रोहित यांनी याच्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले होते. मात्र, कार्यकर्ते प्रेमापोटी इच्छा व्यक्त करतात, असेही मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते. मात्र, हा एकप्रकारे दबाव तंत्राचा भाग असल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे.