अहमदनगर - महाविकास आघाडी सरकारचे आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. कुठल्याही यंत्रणेवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. सरकारचे कोरोना कृती दल काय करत आहे? असा सवाल उपस्थित करतानाच नगर जिल्ह्यातील ऑक्सिजन संपल्यानंतरही तीन मंत्र्यांची कर्तबगारी शून्यच दिसली. पालकमंत्र्यांनाही जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीपेक्षा गोकुळ दूध संघाची निवडणूक महत्त्वाची वाटत असल्याची घणाघाती टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयांना मंजूर असलेला ऑक्सिजनचा कोठा पुणे जिल्ह्यातील आधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता अडवून ठेवत इतर जिल्ह्यात वळविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती आपल्याला समजल्यानंतर याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील राजंणगाव येथे अडवून ठेवलेले ऑक्सिजनचे टॅंकर नगर जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला. याबाबत पालकमंत्र्यासह जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचा निष्काळजीपणाच समोर आला. त्यांची कर्तबगारीही सिध्द झाली, प्रत्येक निर्णयात मुख्यमंत्र्यांनाच लक्ष घालावे लागत असेल तर मंत्री करतात काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - केंद्रावर टीका करण्यापेक्षा त्यांचे सहकार्य घ्या -नवनीत राणा यांचा मोलाचा मंत्र
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा सर्ववेळ भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून मदत आणण्याचे सल्ले देणाऱ्यांची कोविड काळात जिल्ह्यात कर्तबगारी काय? असा खोचक सवाल करून मंत्री बाळासाहेब थोरातांवर त्यांनी निशाणा साधला. सातत्याने केंद्र सरकार आणि विरोधी पक्षाला बेजबाबदार वक्तव्यातून लक्ष करणारे मंत्री नवाब मलीक स्वत:ला समजतात तरी काय?. राज्याकरिता विरोधी पक्षनेत्यांनी 50 हजार रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून तरी आणले. पण विनाकारण त्याचेही राजकारण झाले. या इंजेक्शनबाबत केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी खुलासा करून सर्व वस्तुस्थिती स्पष्ट केली. पण, या दरम्यान इंजक्शनअभावी बळी गेलेल्या नागरिकांची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने घेतली पाहिजे.
हेही वाचा - पोटात ५ महिन्यांचे बाळ, हातात काठी, ही DSP आहे छत्तीसगडची लेडी सिंघम
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री एक दिवस आले आणि फक्त घोषणा करून गेले. इतर मंत्रीही फक्त आढावा बैठका घेत बसले आहेत. जिल्ह्यातील जनतेची काळजी कोण घेणार?. वास्तविक जिल्ह्यात एवढी भयानक परिस्थिती असताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात तळ ठोकायला हवा होता. परंतु, त्यांना जिल्ह्यातील जनतेपक्षाही त्यांच्या कोल्हापुरातील गोकूळ दूध संघाची निवडणूक अधिक महत्त्वाची वाटत असल्याचा टोला विखे-पाटील यांनी लगावला. जिल्ह्यात काल ऑक्सीजनची परिस्थिती बिकट झाल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी आज लोणी येथे माध्यमांशी संवाद साधताना या निष्क्रीय कारभाराला पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील तीनही मंत्री जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे.