अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदाचा सोपविलेला राजीनामा मंजूर केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट शिर्डीत येऊनच दिली. त्यामुळे आता विखे-पाटील कोणती राजकीय भूमिका घेणार याची उत्सुकता जिल्ह्यासह राज्याला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील यांची मैत्री पाहता विखे पाटील यांच्या अनुभवाचा आणि राजकीय शक्तीचा फायदा निश्चितच भाजप करुन घेण्याच्या मानसिकतेत आहे. सहकार क्षेत्रातील तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील नेतृत्व विखे पाटील यांच्या रुपाने भाजपच्या गळाला लागल्याने भविष्यात त्यांच्यावर मोठ्या विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय घडामोडी पाहता अहमदनगर मतदारसंघ विखे यांना सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टपणे नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करुन ही निवडणूक लढविली. निवडणूकीच्या प्रचाराच्या काळात विरोधी पक्षनेते असुनही विखे पाटील यांनी कधी छुप्या पध्दतीने तर कधी उघडपणे डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी मतदारसंघात काम केल्याचे पाहायला मिळाले. या नाट्यमय घडामोडी नंतर विखे पाटील यांचे विरोधी पक्षनेते पद राहणार की जाणार याची उत्सुकता राज्याच्या राजकारणात लागुन राहीली होती.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात प्रचार करणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगुन टाकले होते. आता शिर्डी मतदार संघात ते आघाडीचा प्रचार करतील, अशी अपेक्षा होती. पण या मतदारसंघातही शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पाठीशी विखे पाटील यांनी आपली यंत्रना तैनात केली. या दोन्हीही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयाच्या आशा आता पल्लवीत झाल्याचे चित्र आहे.