अहमदनगर - राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज (१८ जानेवारी) जाहीर होणार आहे. गावा-गावात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथील ग्रामपंचायतीचा निकाल स्पष्ट झाला असून सरपंच पोपटराव पवार यांच्या ग्रामविकास पॅनलने सातही जागा जिंकल्या आहेत.
हेही वाचा - अयोध्येतील राममंदिरासाठी मुस्लिम बांधवांकडून ५१ हजारांचा निधी सुपूर्द
तीस वर्षानंतर झाली निवडणूक
ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवत पोपटरावांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. गेल्या तीस वर्षांमध्ये हिवरेबाजारमध्ये एकही निवडणूक झाली नव्हती. बिनविरोध झालेल्या निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली गावातील एकूण कारभार राहिला होता. गावामध्ये केलेल्या विकासकामांमुळे हिवरेबाजार आणि पोपटराव पवार यांचे नाव आदराने घेतले जाते. यंदा, मात्र तीस वर्षानंतर गावातील एक शिक्षक किशोर साबळे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकास परिवर्तन पॅनल स्थापन करून सात उमेदवार त्यांनी उभे केल्याने गावामध्ये निवडणूक झाली.
निकालानंतर हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी केला जल्लोष -
पुन्हा एकदा गावाने आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या ग्रामविकास पॅनलच्या सर्व सातही उमेदवारांना निवडून दिले. ही निवडणूक अगदी एकतर्फी झाल्याचे निकालानंतर दिसत आहे. पोपटराव यांच्या विरोधात पॅनल उभे करणारे आणि त्यांच्याच वॉर्डात विरोधात उभे ठाकलेले ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे संजय सांबळे यांना अवघी ४६ मते पडली. निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी आणि उमेदवारांनी जल्लोष केला.
हेही वाचा - 'बीजमाता' पद्मश्री राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित; बीज बँक उपक्रमाबद्दल देणार माहिती