अहमदनगर- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी युवती-महिला रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारत आहेत. मुख्यमंत्री उत्तर देण्याऐवजी घाबरले असून पोलिसांमार्फत आंदोलक युवती-महिलांवर दडपशाही केली जात आहे. मात्र, या महिलाच या पेशवाई सरकारची कबर खोदल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केली आहे. भाळवणी येथे आयाेजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा पक्षाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी आयोजित केला होता. युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी नेते या मेळाव्यास उपस्थित होते. साताऱ्याचे उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर मिटकरी यांनी बोलताना सांगितले की भाजपने पक्षप्रवेशावेळी राजांचा अपमान होईल, अशी वागणूक त्यांना दिली आहे.