शिर्डी (अहमदनगर) MP Lokhande On Jayakwadi Water : इंग्रजांनी धरणे बांधून शेतकऱ्यांना पाणी दिलं. परंतु, अहमदनगर जिल्ह्यातील पुढारी एकसंघ राहिले असते तर 2005 चं समन्यायी पाणीवाटप बिल आलं नसतं आणि कायदाही झाला नसता; पण तसं न झाल्यानं आज आमचा शेतकरी अडचणीत सापडला आहे. (MP Sadashiv Lokhande Shirdi meeting) शेतकरी वाचवायचा असेल तर राजकीय गट तट बाजूला ठेवून मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातील 35 आमदार पाणी पीत नसेल तरी एकत्र येतात. तसंच आपलं पाणी टिकविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी एकत्र येऊन 2005 च्या समन्यायी पाणीवाटप कायद्याला पर्याय शोधावा आणि आपल्या हक्काचं पाणी टिकवावं असं आवाहन शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे (MP Sadashiv Lokhande) यांनी शिर्डीतील बैठकीत केलं आहे. जोपर्यंत घाटमाथ्याच्या पाण्याला मान्यता मिळत नाही तोपर्यंत जायकवाडीला पाणी सोडू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. भविष्यात पाण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात आपण सामील होणार असून पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करावा लागेल, असा इशाराही खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला.
'या' धरणातील आवर्तन शेतकऱ्यांसाठी कमी : निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार असल्यानं शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली लाभधारक शेतकऱ्यांची शिर्डीत बैठक पार पडलीय. यावेळी जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके, निळवंडे पाटपाणी समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, सुरेश तरके, संपतराव चौधरी, संजय सदाफळ, रावसाहेब थोरात, महेश देशमुख, राजेंद्र रोहम, राजेंद्र कार्ले यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. गोदावरी, मुळा, निळवंडे व भंडारदरा या धरणातील आवर्तनच शेतकऱ्यांसाठी कमी आहे. त्यात जायकवाडी भागात 7 ते 8 आवर्तन देण्यासाठी नगर व नाशिकवर हा अन्याय कशाला. यासाठी लवकरच शेतकऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतली जाणार असल्याचं यावेळी खासदार लोखंडे म्हणाले आहे.
शेतकऱ्यांचे तलाव व बंधारे भरून देणार : डाव्या कालव्यातील कोपरगाव शाखा, तळेगाव शाखा या भागातील गावांना निळवंडेचे पाणी फक्त गावात आले आणि पाणी दुसऱ्या बाजूला वळवून घेतले. गावातील तलाव व बंधारे भरले नसल्यानं तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया यावेळी लाभधारकांनी व्यक्त केल्या; परंतु आता निळवंडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभधारक यांची संयुक्त बैठक बोलावून टेलपासून संपूर्ण गावातील तलाव व बंधारे भरून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचं खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितलं.
तर अधिकाऱ्यांना चोप देणार: निळवंडेच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या केलवड, आडगाव, खडकेवाके, तळेगाव, चिंचोली, वाकडी, पिंपरी निर्मळ गावातील तलाव व बंधारे पूर्ण भरू न देण्यासाठी निळवंडे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांशी मुजोरी करत असल्याचा आरोप निळवंडे समितीचे विठ्ठल घोरपडे यांनी आपल्या भाषणात केला. अधिकाऱ्यांची दादागिरी चालली तर अधिकाऱ्यांना चोप देणार असे भर बैठकीत शेतकरी म्हणाले.
शेतकरी संतप्त: गोदावरी कालव्यातून जायकवाडीला पाणी सोडले जाणार असल्यामुळं व निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातील शेतकऱ्यांचे बंधारे व तलाव प्रशासकीय अधिकारी भरू देत नाहीत. शेतकऱ्यांनी 2005 च्या कायद्याचा आणि हा कायदा तयार करणाऱ्या नेत्यांचा घोषणा देत निषेध व्यक्त केला. हक्काचं पाणी बाहेर जात असल्यानं शेतकऱ्यांच्या यावेळी तीव्र प्रतिक्रिया पहावयास मिळाल्या.
हेही वाचा:
- Mumbai Pollution : वाढते प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, काय घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय?
- Mumbai Delhi Pollution : मुंबई-दिल्लीच्या धर्तीवर प्रदूषणाची पातळी नियमित राखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज
- Patra Chawl Scam : 'जास्त फडफड करु नको'; पत्राचाळ घोटाळ्याच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या घरावर फेकलं धमकीचं पत्र