अहमदनगर - राज्यातील मंगल कार्यालये अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. त्यामुळे, या व्यवसायाशी संबंधित इतर २४ घटकांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, मंगल कार्यालयात ५०० नागरिकांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घेवून आज संगमनेरमधील वसंत कार्यालयात बैठक पार पडली.
महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स असोसिएशन, तसेच लग्न समारंभावर अवलंबून असणाऱ्या जवळपास २४ घटकांच्या उपस्थितीत नियमांचे पालन करत ही बैठक घेण्यात आली. यावेळी मंगल कार्यालय आणि लॉन्सवर अवलंबून असलेले घटक जसे डेकेरोशन, लॉन, लाईट डेकोरेशन, साउंड सिस्टीम, आर्केस्ट्रा, सूत्रसंचालन, गुरू ब्राह्मण रांगोळी, फोटोग्राफर, स्वागत टीम आदी व्यवसायांना कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे, शासनाने मंगल कार्यालयात ५०० नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी. यामुळे सर्वच घटकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानाची तातडीने भरपाई द्या - किसान सभा