अहमदनगर - राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. असे काही घडले की राज्याचे मुख्यमंत्री ठोस पावले उचलणार असे सांगतात. मात्र, ती वेळ कधी येणार? असा सवाल करत फक्त शहरात सेफ्टी रॅली काढून गावातील महिला सुरक्षित राहणार का? असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज अहमदनगर येथे उपस्थित केला. त्या अकोले बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आल्या होत्या.
चित्रा वाघ आणि अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी पीडित मुलीच्या घरी जावून कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात जावून तपासाबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी आरोपीच्या आठ दिवसात मुसक्या आवळ्या पाहीजेत अशी मागणी केली. पोलीस दलातील वाईट लोकांना सरळ करण्याचे काम झाले पाहीजे. महिला न्याय मागायला जाते त्यावेळी महिलेला भीती वाटते. त्यासाठी पोलिसांमध्ये संवेदनशीलता हवी असल्याचे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
32 वर्षीय गतीमंद महिला आदिवासी आश्रम शाळेजवळ असलेल्या डोंगराळ भागात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. नेहमी तिच्याबरोबर कोणी ना कोणी असते. मात्र, शनिवारी ती एकटची होती. ती संध्याकाळी घरी आलीच नाही. मात्र, शेळ्या घरी आल्या. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता गावठाणातील काटवनात तिचा मृतदेह आढळून आला. यावेळी तिच्या तोंडात टॉवेलचा बोळाही कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.