अहमदनगर - श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथील गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांड खंडणीतून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. ते श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
हिरण अपहरण आणि हत्याकांड आरोपी -
गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून पाच आरोपींना अटक केली आहे. संदिप मुरलीधर हांडे (वय 26, माळेगाव, ता.सिन्नर), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय 25, रा.सप्तशृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर), अजय राजू चव्हाण (वय 26, पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय 29, रा.उक्कडगाव, ता.कोपरगाव) व एक 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून मुद्देमाल जप्त -
आरोपींकडून हिरण यांचा मोबाईल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन (क्र. एमएच 15, जीएल 4387) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. गुन्ह्यातील काही आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासात आणखी काही आरोपी निष्पन्न होतील. हिरण यांच्याकडे अपहरण झाले त्यावेळी 1 लाख 65 हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या मारुती व्हॅनमध्येच करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गालगत आणून टाकण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली.
हेही वाचा - सचिन वझेंच्या 'त्या' व्हाटसअॅप स्टेटस संदर्भात माहिती घेऊन बोलतो - गृहमंत्री अनिल देशमुख
गुन्ह्याचा उलगडा असा झाला -
व्यापारी गौतम हिरण अपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हॅनमधून संशयास्पदरित्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी अनेक व्हॅनचा शोध घेतला. नाशिक येथील ती व्हॅन मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. त्यामुळे संशय बळावल्यानंतर काही तासांमध्ये सर्व आरोपींना पकडले. या गाडीत हिरण यांच्या मोबाईलसह बँकेचे चेकबूक व पावत्या सापडल्या आहे.
1 मार्चला हिरण यांचे अपहरण -
बेलापूरतील प्रसिद्ध व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्चला अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या तपासाची मागणी व्यापारी आणि नातेवाईकांकडुन होत होती. विधानसभेतही विरोधी पक्षाकडुन हा मुद्दा लक्षवेधी करण्यात आला होता. हिरण यांचा सात दिवसांनंतर श्रीरामपुर पोलिसांच्या हद्दीतच दगडाने ठेचुन हत्या केलाला मृतदेह कुजलेला अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत नसल्याचा आरोप केला गेला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन स्थानिक गुन्हेगारांना अटक करत तपास केला असता या हत्येचा उलगडा होत गेला. अखेर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.
हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात