नूर सुल्तान - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत मराठमोळा कुस्तीपटू राहुल आवारे याने ६१ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेत भारताचे हे पाचवे पदक ठरले आहे. दरम्यान, भारताच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत यंदा सर्वोत्तम कामगिरी केली आहे. याआधी २०१३ मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी या स्पर्धेत ३ पदके जिंकली होती.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : दीपक पुनियाला रौप्य, दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून घेतली माघार
कांस्यपदकसाठी झालेल्या सामन्यात राहुलने अमेरिकेचा प्रतिस्पर्धी टेलर ली ग्राफवर ११-४ ने विजय मिळवला. या सामन्यात राहुलने संपूर्णपणे आपले वर्चस्व राखले होते. सामन्याच्या सुरुवातीला अमेरिकन प्रतिस्पर्ध्याने राहुलच्या दोन्ही पायांवर हल्ला करत आक्रमक सुरुवात केली आणि पहिल्याच दणक्यात २ गुण मिळवले. मात्र राहुलने आपले लक्ष विचलीत न होऊ देता, दमदार पुनरागमन केले आणि पुढच्या काही मिनीटांमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली.
हेही वाचा - 'मला पुरस्कारापेक्षा देशासाठी पदके जिंकलेली आवडतात', विक्रमवीर पांघलची प्रतिक्रिया
अखेरच्या काही मिनिटात राहुलने ग्राफ विरोधात १०-२ अशी आघाडी घेतली. तेव्हा ग्राफने सामन्यात परतण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र, त्याला यात अपयश आले आणि राहुलने त्याचा ११-४ ने पराभव केला. दरम्यान, आतापर्यंत राहुलने आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियाई कुस्ती स्पर्धेत २ कांस्य आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
भारतीय कुस्तीपटूंनी कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. राहुल आवारेच्या पदकासह भारताने या स्पर्धेत ५ पदके जिंकली आहेत. यात १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, भारत विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.