मुंबई - दिल्लीकडून रणजी खेळणारा भारतीय क्रिकेटर सुबोध भाटी याने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. टी-२० क्लब क्रिकेट सामन्यात सुबोधने द्विशतक झळकावत आपली छाप सोडली.
सुबोधने दिल्ली इलेव्हनकडून खेळताना नाबाद २०५ धावांची तुफानी खेळी केली. यात १७ षटकार आणि १७ चौकारांचा समावेश आहे. सुबोधने २०५ धावांमधील १०२ धावा अवघ्या १७ चेंडूत चोपल्या. सुबोध सलामीला गेला आणि ७९ चेंडू खेळून नाबाद परतला. सुबोध टी-२० क्लब स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे.
दिल्ली इलेव्हन आणि सिम्बा संघ यांच्यात दिल्लीमध्ये सामना पार पडला. या सामन्यात सुबोधने तुफानी फटकेबाजी केली. त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यात त्याने २५० हून अधिक स्ट्राइट रेटने धावा केल्या. या कामगिरीसह सुबोध चर्चेत आला आहे.
सुबोधच्या संघाने २० षटकांत एक गडी गमावत २५६ धावा केल्या. यापूर्वी सुबोधने दिल्ली संघासाठी देशांतर्गत स्पर्धेत महत्त्वपूर्ण खेळी खेळत अनेक सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान, या खेळीमुळे सुबोधसाठी आयपीएलचे दरवाजे उघडतील का? हे पाहावे लागेल.
दरम्यान, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची खेळीचा विक्रम ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने आयपीएलमध्ये १७५ धावांची खेळी केली होती. त्याने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना ६६ चेंडूत नाबाद १७५ धावा झोडपल्या होत्या.
हेही वाचा - सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनल्यानंतर कसे वाटत आहे? मिताली राजचे ३ शब्दात उत्तर
हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नी साक्षीला दिलं खास गिफ्ट, पाहा फोटो