कोलकाता - आयपीएलमध्ये रविवारी कोलकात्याविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईला ३४ धावांनी पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने केलेल्या एका कृत्यामुळे तो क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने दिलेल्या २३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चागंली झाली नाही. हार्दिक पांड्या वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. चौथ्या षटकात रोहीत १२ धावांवर खेळत असताना हॅरी गर्नीने त्याला पायचित केले. या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी रोहितने DRS ची मदत घेतली. पण तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवले. यांनतर आपली नाराजी व्यक्त करत रोहितने पंचांच्या जवळ जात आपल्या बॅटने स्टम्प्संवरील बेल्स उडवल्या. रोहितच्या अशा वागण्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका होत आहे.
या कृत्यानंतर रोहित शर्मावर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत आयपीएलकडून करावाई करण्यात आली असून रोहितला सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.