मुंबई - जगातील सर्वात मोठी टी-२० लीग स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) थरार सध्या सुरू आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेत दरदिवशी अनेक मोठमोठे विक्रम रचले जात आहेत. तर अनेक खेळाडूंची डोळे दिपवणारी कामगिरी पाहायला मिळत आहे.
आयपीएलमधील कामगिरी ही विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे 'तिकीट' मिळवून देऊ शकते, असा अनेक युवा खेळाडूंचा समज होता, मात्र याबाबत भारतीय क्रिकेट निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
![एम. एस. के. प्रसाद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/731978-636690-msk-prasad-afp_0304newsroom_00329_136.jpg)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एम. एस. के. प्रसाद म्हणाले की, आयपीएलमध्ये खेळाडूंनी केलेली कामगिरी ही वर्ल्डकपसाठीचा संघ निवडताना ग्राह्य धरली जाणार नाहीय. प्रसाद यांनी यापूर्वीच स्पष्ठ केले आहे, की आगामी विश्चचषकासाठी १५ एप्रिलला भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही एम. एस. के. प्रसाद यांच्यासारखीचच भूमिका घेतली होती. रोहित म्हणाला होता की, आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीवरून वर्ल्डकपसाठी संघनिवड होता कामा नये. आयपीएलमध्ये चांगल्या प्रदर्शनामुळे फलंदाजांमध्ये धावा करण्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. मात्र, यातून प्रतिभेची निवड करणे शक्य नाही. कारण टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट हे पूर्णपणे वेगळे असल्याचे मत रोहितने व्यक्त केले आहे.