मुंबई - आयपीएल २०२०मध्ये काल रविवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रोमांचक सामना झाला. त्याचवेळी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यांच्यात ट्विटवर एक वेगळाच सामना रंगला होता. युवराजने पंजाबचा संघ प्ले ऑफ आणि स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार, अशी भविष्यवाणी केली. यावर चहलने, भाऊ, आम्ही भारतात परत येऊ का? असे मजेशीर उत्तर दिले.

झाले असे की, युवराजने पंजाबचा संघ प्ले ऑफ गाठून स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार असे, भाकित ट्विटच्या माध्यमातून वर्तवले. यावर युजवेंद्र चहलने युवराजला मजेशीर उत्तर दिले. त्याने, भाऊ, आम्ही भारतात परत येऊ का? असे युवराजला विचारले. दोघातील हा सामना एवढ्यावरच संपला नाही. चहलच्या प्रश्नावर युवीने उत्तर दिले. स्पर्धेत अजून आणखी षटकारांचा मार खाऊन तसेच आणखी विकेट घेऊन परत ये, असे युवराज म्हटलं. यावर चहलने, ओके भाऊ, १० नोव्हेंबरपर्यंत षटकारांचा मार खाऊन घेईन आणि विकेटही घेईन, असे सांगितलं. चहलच्या उत्तरावर युवराज म्हणाला, अंतिम सामना नक्की पाहून ये.


सद्यघडीला दिल्ली १४ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर मुंबईचा संघ आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे बंगळुरू आणि कोलकाताचा संघ कायम आहेत. हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे. तर पंजाबने आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर चेन्नई आणि राजस्थान सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. पंजाबने मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी ८ सामने खेळली होती. यात त्यांनी ६ सामने गमावले होते. त्यामुळे त्यांना पुढील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे.