इंदूर - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ७ गडी राखून मात केली आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेत आघाडी मिळवली. भारतीय गोलंदाजांनी विजयी सामन्यात भेदक गोलंदाजी केली. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने भारतीय गोलंदाजांचे कौतूक केले. तसेच त्याने ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्व करंडकासाठी एक सरप्राईज पॅकेज असल्याचे सांगितले.
दुसरा सामना संपल्यानंतर विराटने बोलताना सांगितले, की 'ऑस्ट्रेलियातील विश्व करंडक स्पर्धेसाठी ज्याच्याकडे गती चांगली असेल आणि तो बाऊन्सर चेंडू टाकू शकतो अशाला संधी मिळू शकते. सद्या प्रसिध्द कृष्णा स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. यामुळे तो सरप्राईज पॅकेज ठरू शकतो.'
प्रसिद्ध कृष्णाने ४१ स्थानिक सामन्यात ६७ बळी घेतले आहेत. त्याने प्रथम श्रेणीमध्ये ६ सामन्यात २० गडी बाद केले आहेत. सौराष्ट्र विरुद्ध खेळताना कृष्णाने आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले होते. त्याने या सामन्यात १९ धावात ५ फलंदाजांना माघारी धाडले होते.
केकेआरचा प्रमुख खेळाडू आहे कृष्णा -
२३ वर्षीय प्रसिद्ध कृष्णा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्याने आतापर्यंत १८ आयपीएल सामने खेळली असून त्यात त्याने १४ गडी बाद केले आहेत. त्याची इकोनॉमी ९.३२ इतकी आहे. दरम्यान, कृष्णाने २०१८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
भारत-श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना शुक्रवारी (ता. १०) पुण्यात खेळवला जाणार आहे.
हेही वाचा - ICC Test Ranking : विराटसह स्टिव्ह स्मिथला १४ कसोटी खेळणाऱ्या लाबुशेनचा धोका
हेही वाचा - संकटात सापडलेल्या मुंबईला आदित्य तरे 'तारणार' का?