नवी दिल्ली - भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतवरील स्पॉट फिक्सिंगसाठी असलेली सात वर्षांची बंदी रविवारी संपुष्टात आली. श्रीशांतवर आजीवन क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती. परंतु या निर्णयाच्या विरोधात त्याने कायदेशीर लढा दिला. बंदी संपल्यानंतर स्थानिक क्रिकेट खेळण्याची इच्छा श्रीशांतने यापूर्वीच व्यक्त केली आहे. शिवाय, आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्यास श्रीशांतचा नक्की विचार केला जाईल, असे केरळ राज्य क्रिकेट संघाने सांगितले आहे.
''मी आता सर्व प्रकारच्या आरोपातून पूर्णपणे मुक्त आहे आणि आता मी सर्वात जास्त आवडलेल्या खेळाचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रत्येक चेंडू टाकण्यासाठी मी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करेन, मग तो सराव असला तरी. माझ्याकडे जास्तीत जास्त पाच ते सात वर्षे शिल्लक आहेत आणि मी ज्या संघासाठी खेळेण, त्यासाठी खूप प्रयत्न करेन'', असे त्याने बंदी संपण्याच्या दोन दिवस आधी सांगितले आहे.
भारताचा स्थानिक क्रिकेटचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो. परंतू कोरोनामुळे संपूर्ण वेळापत्रक बिघडले आहे. २०१३च्या आयपीएलच्या मोसमात स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. परंतू, गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावरील बंदी सात वर्षांपर्यंत आणली होती.
श्रीशांत टी-२० आणि एकदिवसीय वर्ल्डकप जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य होता. २०११ वर्ल्ड कपपासून तो भारताकडून खेळलेला नाही. २००५मध्ये श्रीशांतने श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००६मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. २७ कसोटीत त्याने ८७ तर ५३ एकदिवसीय सामन्यात त्याने ७५ विकेट्स घेतल्या आहेत.