सिडनी - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. कांगारूंच्या ३७५ धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही. हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी जिगरबाज खेळी केली. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. या सामन्यात हार्दिक पांड्याने ९० करत मोठा विक्रम प्रस्थापित केला.
हार्दिकने ७ चौकार आणि ४ षटकारांसह ९० धावा टोलवल्या. अर्धशतकानंतर त्याने आक्रमक फलंदाजी केली. यासह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा पल्ला ओलांडला. केवळ पल्लाच ओलांडला नाही तर, सर्वात जलद १००० धावा नोंदवणारा तो फलंदाज ठरला. हार्दिकने ८५७ चेंडूत १००० धावा केल्या. यापूर्वी, हा विक्रम केदार जाधवच्या (९३७ चेंडू) नावावर होता.

नाणेफेक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५० षटकांत ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावा करता आल्या. संघासाठी तडाखेबंद शतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.