दिल्ली - भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवरील आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उठवली. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. श्रीसंत टेनिस खेळाडू लिएंडर पेसचे उदाहरण देताना म्हणाला की, जर लिएंडर पेससारखा महान खेळाडू वयाच्या ४२व्या वर्षी ग्रँड स्लॅम जिंकत असेल तर मी ही क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकतो.
प्रसार माध्यामांशी बोलताना श्रीसंतच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. तो म्हणाला की, माझी निवड करणे हे निवड समितीच्या हातात आहे. अजून क्रिकेट खूप आहे. जय माता दी. बऱ्याच खेळाडूंना दुखापत होते. त्यामुळे ते मैदानापासून दूर राहतात. मी ही दुखापत झाल्याने मैदानाबाहेर होते असे समजून चालत आहे.
श्रीसंत पुढे म्हणाला की, क्रिकेटर आशीष नेहरा हा वयाच्या ३८ वर्षीपर्यंत खेळत होता. मी तर आता ३६ वर्षाचा आहे. माझा सराव सुरू आहे. मी मैदानावर लवकरच परतेन असा विश्वास व्यक्त केला.
श्रीसंत गेल्या ६ वर्षापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. गेल्या काही वर्षापासून बीसीसीआयने सुनावलेल्या आजीवन बंदीविरोधात श्रीसंत सर्वोच्च न्यायालयात लढा देत होता. आज त्याच्या लढ्याला यश आले आहे.