इंदूर - भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझाने जवळपास दोन दशके घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर क्रिकेटच्या सर्व प्रारूपातून निवृत्तीची घोषणा केली. मध्यप्रदेशच्या ओझाने भारतासाठी एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. रणजी स्पर्धेत यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी (३५१) घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
हेही वाचा - चेन्नईत अश्विनचा बोलबाला, दिग्गज क्रिकेटपटूची केली बरोबरी
इंदूर पत्रकार परिषदेत ओझाने सर्व प्रकारच्या स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली. ओझाने जगातील टी-२० लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना ३७वर्षीय ओझाचे डोळे पाणावले होते. तो म्हणाला, "मी क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्त होत आहे. हा एक लांबचा प्रवास होता. राज्य आणि राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. कारकिर्दीत मला साथ दिल्याबद्दल मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशन (एमपीसीए), बीसीसीआय आणि सहकारी खेळाडू व प्रशिक्षकांव्यतिरिक्त माझ्या कुटुंब आणि मित्रांचे आभार मानू इच्छितो."
आंतरराष्ट्रीय पदार्पण -
वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी २०००-०१च्या मोसमात ओझाने घरगुती क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. मात्र, त्याच वेळी भारताला महेंद्रसिंह धोनी मिळाल्यामुळे ओझाला संघात अधिक संधी मिळणे कठीण झाले. घरगुती क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याला २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका आणि झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्याची संधी मिळाली. २०१४मध्ये भारताच्या 'अ' संघासह ऑस्ट्रेलिया दौर्यावर चमकदार कामगिरी केल्यावर त्याची २०१५मध्ये भारताच्या कसोटी संघात निवड झाली. श्रीलंका दौर्यावरील तिसर्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात २१ धावा आणि दुसऱ्या डावात ३५ धावांचे योगदान दिले.
प्रथम श्रेणी कामगिरी -
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४३ सामन्यांत ४१.६७च्या सरासरीने ९७५२ धावा केल्या आहेत. यापैकी त्याने ७८६१ धावा रणजी स्पर्धेत जमवल्या आहेत. त्याच्या नावावर यष्टिरक्षक म्हणून ५४ त्रिफळाचितसह ४७१ बळींची नोंद आहे. मध्य प्रदेश व्यतिरिक्त त्याला इतर संघांकडून खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याने कुटुंबाला प्राथमिकता देत ही संधी नाकारली.
गेल्या वर्षी जानेवारीत उत्तर प्रदेश विरुद्ध नमन ओझाने शेवटचा रणजी सामना खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे. तो आयपीएल विजेते सनरायझर्स हैदराबादचा सदस्य होता.