नवी दिल्ली - स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत येण्यासाठी क्रिकेटपटूंना किमान चार आठवड्यांचे प्रशिक्षण आवश्यक असेल, असे भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सांगितले. एका कार्यक्रमात कार्तिक म्हणाला, ''मला वाटते हा बदल कठीण असेल. आपल्याला हळूहळू सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यानंतर, उर्जेवरही लक्ष द्यावे लागेल.''
कार्तिकने स्वत: घेत असलेल्या सरावासंदर्भात सांगितले. तो म्हणाला, "चेन्नईतील लॉकडाऊनमध्ये थोडीशी सूट देण्यात आली आहे. तुम्ही परवानगीने सराव करू शकता. मी याचा विचार करत आहे. शरीर कार्यरत स्थितीत नाही. मी घरी आहे. बसून काहीही करत नाही."
आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी खेळाडूंना सहा-आठ आठवड्यांच्या सरावाची आवश्यकता असेल, असे मत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी दिले. "लॉकडाउन अर्धवट दूर केले गेले आहे. परंतु आंतरराज्यीय प्रवासामध्ये अडचणी येतील. आता खेळाडूंना त्यांच्या शहराची उपलब्ध मैदाने प्रशिक्षणासाठी वापरावी लागतील. आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास आम्हाला किमान सहा ते आठ आठवडे लागतील. दरम्यान आम्ही प्रथम कौशल्यावर आणि तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करू आणि त्यानंतर सामन्याच्या परिस्थितीनुसार आम्ही सरावावर लक्ष देऊ. आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यापूर्वी बीसीसीआयने एखादी स्पर्धा आयोजित करावी ही आमची अपेक्षा आहे", असे ते म्हणाले.