मुंबई - बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजन करण्यात येत असलेल्या २ सामन्याच्या टी-२० मालिकेवर कोरोना विषाणूमुळे टांगती तलवार निर्माण झाली आहे. या महिन्याच्या शेवटी आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश या संघामध्ये ही मालिका आयोजित केली आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील सामने रद्द करू शकते. पण, अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
आशियाई एकादश संघात विराट कोहलीसह कुलदीप यादव, मोहम्मद शमी, शिखर धवन, ऋषभ पंत आणि केएल राहुल या सहा खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, चीनपासून सुरुवात केलेल्या कोरोना विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जवळपास ४ हजाराहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जगभरातील ९० हून अधिक देशात हा विषाणू पसरला आहे. भारतामध्ये देखील कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील पहिला सामना १८ मार्चला आणि दुसरा सामना २१ मार्चला होण्याची शक्यता आहे. या सामन्याचे आयोजन ढाक्याच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम आहे. पण आता कोरोनाच्या फैलावामुळे ही मालिका होणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - IND vs SA : कोरोना विषाणूच्या धास्तीने युजवेंद्र चहल मास्कमध्ये, शेअर केला फोटो
हेही वाचा - आयपीएलसह आरसीबीला कोरोनाचा फटका, काय आहे प्रकरण वाचा...