मुंबई - 'झी युवा' वाहिनीवरील 'वर्तुळ' या मालिकेने नुकताच १०० एपिसोडचा टप्पा पूर्ण केला. यानिमित्ताने मालिकेतील सर्व कलाकारांनी केक कापून यशाचं सेलिब्रेशन केलं. झी युवावरील 'वर्तुळ' या मालिकेत मिनाक्षी या एका अनाथ मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या मुलीच्या आयुष्यात अभिजित हा एका चांगल्या कुटुंबातील मुलगा येतो आणि तिच्या प्रेमात पडतो. त्याच्यासोबत लग्न करून सेटल होण्याचा निर्णय ती घेते. मात्र तिचा भूतकाळ तिला स्वस्थ बसू देत नाही.
तिचा जुना नवरा चेहरा बदलून पुन्हा तिच्या आयुष्यात येतो आणि तिच्या संसाराला नवीन कलाटणी मिळते. मालिकेची कथा सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या सासू सुनेच्या भांडणं आणि प्रेमकहाणी यापेक्षा वेगळी असल्याने प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. मालिकेचं सादरीकरण सस्पेन्स थ्रीलर जॉनरने होत असल्याने त्यातील उत्कंठा टिकून राहिली आहे.
बुधवारी या मालिकेतील मुख्य कलाकार जुई गडकरी, विकास कदम आणि विजय आंदळकर यांनी इतर कलाकारांसोबत केक कापून हे यश साजर केलं. ही मालिका करण्यासाठी प्रचंड मेहनत केली असली तरी त्याला प्रेक्षकांची साथ मिळाल्याने आपण समाधानी असल्याचं या तिघांनी यावेळी सांगितलं.