मुंबई - सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘समांतर’ ही मराठी वेब सिरीज प्रचंड यशस्वी ठरली. ही मालिका सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित असून ‘समांतर-२’ ते कथानक पुढे घेऊन जाते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजचा सिक्वेल मराठी मनोरंजन उद्योग क्षेत्रात खळबळ माजवताना दिसतोय. प्रेक्षकांनी या भागालासुद्धा भरघोस प्रतिसाद दिला आहे. ‘समांतर-२’ चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘आनंदी गोपाळ’ चे दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी केले आहे. निर्माते अर्जुन व कार्तिक यांनी ‘समांतर-२’ मध्ये कोणतीही तडजोड न करता सर्जनशीलपणे लक्ष घातले, असे समीर विध्वंस यांनी सांगितले.
समीर विद्वांस म्हणाले की, हे सिरीज शूट करताना त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते असेही ते बोलले. जेव्हा दिग्दर्शकाला निर्मात्यांचा पूर्ण पाठिंबा असतो त्यावेळेला त्याचीही सर्जनशीलता उभारून येते. त्यामुळेच सध्या ‘समांतर-२’ चे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतेय.
‘समांतर-२’चे दिग्दर्शक समीर विद्वांस हे पहिल्यांदाच वेब सिरीजचे दिग्दर्शन करीत आहेत. ‘या वेब मालिकेचे निर्माते व जीसिम्सच्या अर्जुन सिंग बरान व कार्तिक डी निशाणदार यांच्या दमदार पाठिंब्यामुळे असलेले दडपण निघून गेले. ‘समांतर’च्या या सिझनचे दिग्दर्शन करताना माझ्यासमोर अनेक आव्हाने होती कारण एकतर मी पहिल्यांदाच वेब मालिकेचे दिग्दर्शन करत होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिचे चित्रीकरण कोरोना महामारीमुळे लादलेल्या लॉकडाऊनमध्ये केले गेले. अर्थात शासनाने आखून दिलेल्या नियमांनुसार. पण या सर्व आव्हानांवर मात करत आम्ही आमच्या मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने यशस्वीपणे मालिका पूर्ण केली, असे समीर म्हणाले.समीर विद्वांस पुढे म्हणाले, समांतर’ च्या सिझन-१ ला अभूतपूर्व असे यश मिळाले होते. या वेब मालिकेला तब्बल २०० दशलक्ष प्रेक्षकांनी पसंती दिली होती. त्यामुळे थोडे दडपण जरूर होते. परंतु निर्मात्यांनी आर्थिक पाठबळासोबतच मानसिक आधारही दिला, त्यामुळे माझा मार्ग सुकर झाला, हे आवर्जून नमूद करायला हवे. ‘समांतर’ ही नाट्यमय मालिका असून ती गूढता व रोमांच याने पुरेपूर भरलेली आहे आणि त्यामुळे ती रसिकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ‘समांतर-२’ आम्ही मुंबई, पुणे, पाचगणी, महाबळेश्वर, भोर आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणी नैसर्गिक सौंदर्यामध्ये चित्रित केली आहे. त्यामुळे या मालिकेचा नैसर्गिक लूक कायम राहिला आहे. समीर विद्वांस यांनी अर्जुन आणि कार्तिक यांचे आभार मानत म्हटले, ‘या दोघांनी या मालिकेमध्ये सर्जनशीलपणे लक्ष घातले आणि दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली नाही. ते नवीन संकल्पनांचा खुल्या दिलाने स्वीकार करतात आणि त्या प्रत्यक्षात कशा येतील यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनी ‘समांतर’च्या निर्मितीच्या काळात कलाकार आणि माझ्याबरोबर अगदी जवळून काम केले आणि प्रत्येकजण सर्वोत्तम कामगिरी करेल याची खात्री केली.
‘समांतर-२’ चे निर्माते अर्जुन आणि कार्तिक म्हणाले की, “समांतर-२’ दिग्दर्शित करताना मुख्य गाभ्याला न बदलता समीर ने वेगळेपण आणले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे पर्वही नाविन्यपूर्ण वाटेल आणि आवडेल. या सिझनमध्ये नितीश भारद्वाज, स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडीत तसेच सई ताम्हणकर यांच्या भूमिका आहेत. त्यामुळे या सिझनला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे.