गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मना प्रेक्षकांचा उत्तम पाठिंबा मिळू लागला होता. मनोरंजन मुठीत म्हणजेच मोबाईलवर उपलब्ध झाल्यामुळे तरुणाईने या प्लॅटफॉर्मला पसंती दिली होती. गेल्यावर्षी उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे लादलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरीच बसावे लागले होते. त्या काळात मनोरंजासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि त्यामुळेच वेब-मालिकांच्या व वेब-चित्रपटांच्या निर्मितीत लक्षणीय वाढ झाली. झी ५ हा एक प्रतिष्ठित ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जो अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची व चित्रपटांची निर्मिती करीत असतो. त्यांचे नवीन वेब-पुष्प म्हणजे ‘२०० - हल्ला हो’ हा सिनेमा जो हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणार आहे. सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, या चित्रपटामध्ये, अमोल पालेकर, रिंकू राजगुरू आणि उपेंद्र लिमये, वरूण सोबती, साहील खट्टर, सलोनी बत्रा आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या भूमिका आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
ट्रेलरमध्ये कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिकेची झलक दिसते. सत्य घटनेवर आधारित या कथेमध्ये स्त्रियांना न्याय मिळवण्यासाठी, कोणत्या परिस्थितीमध्ये हा लढा लढण्याची ताकद मिळाली आणि निर्णय घेतला याचे अतिशय सुरेख चित्रण केले आहे. या चित्रपटामध्ये, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, सैराट फेम रिंकू राजगुरू आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये अशी तगडी स्टार कास्ट असून हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.
![नवीन वेब चित्रपट ‘२०० - हल्ला हो’](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-200hallaho-zee5-amol-palekar-rinku-rajguru-upendra-limaye-mhc10001_19082021012839_1908f_1629316719_774.jpeg)
‘२००- हल्ला हो’ या चित्रपटाद्वारे अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे बऱ्याच काळानंतर पडद्यावर पुनरागमन होत असून हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून त्यातील प्रेरित दमदार कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. याची गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन गुंडगिरी करणाऱ्या टोळ्या, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला.
![नवीन वेब चित्रपट ‘२०० - हल्ला हो’](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-200hallaho-zee5-amol-palekar-rinku-rajguru-upendra-limaye-mhc10001_19082021012839_1908f_1629316719_917.jpeg)
रिंकू राजगुरू म्हणाली, "स्वतःसाठी आणि इतरांसाठी बोलणे किती महत्त्वाचे आहे हे देखील या कथेतून आपल्याला कळते. ही कथा सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे, मला माझे पात्र हे स्त्रियांनी मिळवलेल्या न्यायाबद्दल जागरूकता पसरवण्याची संधी आहे असे वाटले. दलित स्त्रिया कशा रोज भरडल्या जात होत्या, पण त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही याचे मला फार वाईट वाटले. माझं रक्त अक्षरशः खवळले होते म्हणूनच मी हे पात्र साकारले आहे, जे स्वतःसाठी आणि इतरांसाठी आवाज उठवते. दिग्दर्शक सार्थक सरांनी जेव्हा पहिल्यांदा मला ही कथा ऐकवली तेव्हाच मला कथेतील वास्तवाने हलवून टाकले.”
![नवीन वेब चित्रपट ‘२०० - हल्ला हो’](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-200hallaho-zee5-amol-palekar-rinku-rajguru-upendra-limaye-mhc10001_19082021012839_1908f_1629316719_106.jpeg)
अमोल पालेकर म्हणाले, "जातीयवाद आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध ऍस्ट्रोसिटीसाठी आवाज उठवणाऱ्या या स्त्रियांना हे एक अभिवादन आहे. चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे मला काम करायला अधिक छान वाटले. मला कथेमधील जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा धागा आवडला जो भारतीय चित्रपटांमध्ये आधी फार दिसायचा नाही. तसेच, जातीची दडपशाहीला बळी पडलेल्या स्त्रियांनी न डगमगता केलेला संघर्ष, हे तथ्य फार आवडले. माझे रिटायर्ड दलित न्यायाधीशाचे पात्र आम्ही सखोल चर्चा करून रंगवल्यामुळे त्याला अनेक कंगोरे आहेत.”
योडली फिल्म्स द्वारे निर्मित, सारेगामा द्वारे प्रदर्शित आणि सार्थक दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित ‘२००- हल्ला हो’ हा वेब-चित्रपट २० ऑगस्टपासून झी ५ वर पाहावयास मिळेल.