मुंबई - लग्न म्हणजे सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध. ज्या व्यक्तीच्या आपण शोधात असतो. त्याची भेट अचानक एखाद्या वळणावर होते. त्यानंतर सुरू होतो सहजीवनाचा सात जन्माचा प्रवास. जन्मभराच्या या गाठी बहुतांशी परस्परविरोधी स्वभावाच्या माणसांमध्ये जोडल्या जातात. असंच काहीसं 'संजीवनी' आणि 'रणजीत'च्या बाबतीत घडले आहे.
'राजा राणीची गं जोडी' मालिका सध्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. संजीवनीला रणजीत बघता क्षणीच आवडला होता. पण, त्याचे आपल्या बहिणीशी लग्न होणार असल्याचे कळताच तिला धक्का बसला होता. मात्र, नियतीला कुठेतरी हे मान्य नव्हते. संजीवनीच्या बहिणीचे म्हणजे स्वरांगीचे दुसऱ्या कोणावर प्रेम असल्यामुळे ती घर सोडून निघून जाते. या सर्व घटनेनंतर संजीवनीला रणजीत रीतसर लग्नाची मागणी घालतो. संजीवनी रणजीतशी लग्न करण्यास होकार देखील देते. पण, कोणत्या कारणामुळे ती होकार देते ? संजीवनी आनंदी आहे का ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे.
हेही वाचा -जुळ्यांची अनोखी जुगलबंदी 'प्रेमाचा गेम सेम टू सेम'
अनेक चढउतार, अडचणी पार केल्यानंतर संजीवनी रणजीतचे ऋणानुबंध जोडले जाणार आहेत. या राजा राणीचा लग्न सोहळा आनंदात, धूमधडाक्यात पार पडणार आहे.
संजीवनी आणि रणजीतचा लग्नानंतरचा प्रवास कसा असेल? आलेल्या अडचणींचा सामना करत रणजीत आणि संजीवनीचा संसार कसा असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी भागात पाहायला मिळणार आहेत. २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत संजीवनी आणि रणजीत यांचा विवाहसोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
हेही वाचा -मनोरंजन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी 'तान्हाजी' सिनेमातील 'शेलारमामां'चा पुढाकार