मुंबई - सोशल मीडियावर गाजलेल्या #MeToo या चळवळीअंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते. याप्रकरणी नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रारह दाखल करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणात नानांना क्लिन चिट मिळाली आहे. तनुश्रीने केलेल्या आरोपांसंदर्भात कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचा अहवाल ओशिवरा पोलिसांनी न्यायालयात दाखल केला. त्यामुळे नाना पाटेकरांना दिलासा मिळाला आहे. असे असले, तरीही या अहवालात काहीही तथ्य नसल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. यासोबतच तिने मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला आहे.
तनुश्री म्हणाली, 'भ्रष्ट पोलिसांनी भ्रष्ट माणसाबद्दल दिलेला हा अहवाला आहे. नानांनी केवळ माझ्याबाबतच गैरवर्तवणूक नाही, तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना अशी वागणूक दिली आहे'.
तनुश्रीने नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर #MeToo चळवळीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. नाना पाटेकरांचे नाव समोर आल्यानंतर इतरही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या कथा व्यक्त केल्या. या प्रकरणात नाना पाटेकर यांच्या बाजुने उभे राहणारे कलाकारही समोर आले. तर, काहीजणांनी तनुश्रीला पाठिंबा दिला. आता या प्रकरणात सध्यातरी नानांना क्लिन चीट मिळाली आहे. यामध्ये आणखी कोणते वळण येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.