कुल्लू - देशभरात लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत कंगना रनौत मनाली येथे आपला वेळ घालवत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या आयुष्यातील काही आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.
जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांनी संयम बाळगावा यासाठी कंगन ने एका व्हिडिओद्वारे तिचा कठीण काळ उलगडला आहे. जेव्हा कंगना 16 वर्षांची होती तेव्हा ती घरातून पळून गेली होती. मुंबई येथे गेल्यानंतर तिला आयुष्याचा कठीण काळ अनुभवावा लागला. एक वेळ अशी आली होती की तिच्या मनात आत्महत्या करावी असाही विचार आला होता. मात्र, या कठीण प्रसंगातून ती मोठ्या हिंमतीने बाहेर आली.
जेव्हा ती या कठीण काळाचा सामना करत होती, तेव्हा तिला चांगले मित्र मिळाले. तसेच योगा आणि ब्रम्हचार्यामुळे तिला दिशा मिळाली. स्वामी विवेकानंद आपले गुरु असल्याचेही तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
वाईट दिवसानंतर चांगले दिवस येतात. त्यामुळे देशात देशातील सध्याच्या परिस्थितीला हिंमतीने सामोरे जाऊयात. कोरोनाला लढा देण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहनही तिने या व्हिडिओ द्वारे केले आहे. तसेच गरजू व्यक्तींना मदत करा, असा संदेश तिने दिला आहे.