मुंबई - झाडांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सयाजी शिंदे हे कायमच प्रयत्नशील असतात. आपल्या राहत्या गावीदेखील त्यांनी वृक्षरोपणाच्या माध्यमातून मोठं काम केलं आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी वारी प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन साजरी करता येणं शक्य नाही. त्यामुळे विठू माऊली जशी अध्यात्मिक सावली देते, त्यानुसार आपल्याला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू झाडं देत असतात. त्यामुळे यंदा झाडातील देवाला महत्त्व देऊन त्याची आराधना करण्याची विनंती त्यांनी वृक्षप्रेमींना केली होती. त्यांच्या या अवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
आपापल्या गावातील आणि खेड्यातील ३०० सगळ्यात जुनी झाडं हेरून त्यांच्यासोबत फोटो काढून अनेकांनी त्यांना पाठवले. यातील सर्वोत्कृष्ट १० फोटो निवडून त्या झाडांना प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय सयाजी शिंदे यांनी घेतला आहे. त्याशिवाय वर्षातून एकदा या जुन्या झाडांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त सावलीसोबत एक वारी असा उपक्रम राबवून त्यांची आपल्यातील सामाजिक जबाबदारी सांभाळणाऱ्या नटाची पुन्हा एकदा ओळख करून दिली. त्यासोबत भक्तीच्या रंगात रंगलेल्या वारकरी संप्रदायाला निसर्गदेवतेची आराधना करण्याची अनुभूती देऊन त्यांनी एक नवीन प्रथा अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारं गायक महेश काळेचं गाणं ‘विठ्ठला..!’
महाराष्ट्रात कायमच नवीन आणि स्वागतार्ह कल्पना पटकन आत्मसात केल्या जातात. आषाढी वारी जशी परंपरागत वर्षानुवर्ष सुरू आहे. तशीच ही सावलीतील वारीही दरवर्षी साजरी करण्याची पंरपरा रूढ झाली, तर आपण या भूमातेच्या ऋणातून उतराई होण्याच्या दिशेने टाकलेलं ते एक सकारात्मक पाऊल ठरेल.