मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत चित्रपटांसोबतच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि बिनधास्त बोलण्याने चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही असो वा चित्रपसृष्टीतील स्त्री पुरुष भेदभाव कंगना अगदी खुलेपणाने आपले मत व्यक्त करत असते. अशात आता तिनं अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.
भारताच्या मंगळ मोहिमवर असलेला 'मिशन मंगल' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. ज्यात मंगळ मोहिमेतील महिलांचे योगदान दाखवण्यात आले. मात्र, स्त्रीप्रधान चित्रपटांमध्येही आपल्याला मोठ्याच कलाकारांची गरज का लागते, असा सवाल उपस्थित करत तिनं अप्रत्यक्षरित्या अक्षयला टोला लगावला आहे.
चित्रपटांमधील भूमिका असो वा मानधन महिलांना नेहमीच दुय्यम स्थान मिळते. मात्र, असं असतानाही सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवण्याऐवजी हे सर्व सहन केले जाते, असंही ती यावेळी म्हणाली. कंगना अनेकदा स्त्रीप्रधान सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. यात तिच्या तनु वेड्स मनु, क्वीन, मणिकर्णिका आणि आता जयललितांच्या बायोपिकचा समावेश आहे.