मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे आज वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. यकृताच्या आजारामुळे काही दिवसापासून हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रंगभूमीवरचा हा प्रतिभावंत अभिनेता आणि दिग्दर्शक सिनेजगतातही कमी काळात आपली छाप सोडून गेला. त्यांच्या कारकिर्दीवर छोटासा दृष्टीक्षेप टाकूयात.
मराठी चित्रपटसृष्टीत चांगल्या कलाकृती बनण्याचे काम जेव्हा थंडावले होते तेव्हा निशिकांत कामत हा तरुण दिग्दर्शक उदयाला आला. एकंकाकिका, नाटक यातून चौफेर कामगिरी करणाऱ्या कामत यांनी २००५ मध्ये डोंबिवली फास्ट हा सिनेमा बनवला. त्यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधणारा होता. या चित्रपटाला तुफान यश लाभले. त्यांनंतर त्यांनी २००८ च्या 'मुंबई मेरी जान' या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात इरफान आणि आर माधवन यांनी अभिनय केला होता. या चित्रपटामुळे एक उमदा दिग्दर्शक भारतीय सिनेमाला मिळाला.
अभिनयाची उत्तम जान असणाऱ्या निशीकांत यांनी २०१६ मध्ये जॉन अब्राहम-अभिनीत रॉकी हॅन्डसममध्ये खलनायकाच्या भूमिका प्रभावीपणे साकारली होती. या चित्रपटाचेही दिग्दर्शन त्यांनीच केले होते. त्यानंतर हिंदी चित्रपटाच्या टॅलेंटेड दिग्दर्शकांमध्ये कामत यांची गणना व्हायला सुरुवात झाली. त्याच दरम्यान दृष्यम या मल्याळम चित्रपटाने दक्षिणेमध्ये जोरदार लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने घाट घातला. हिंदीमध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करेल याची चर्चा सुरू झाली आणि निर्मात्यांनी निशीकांत कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
दृष्यम हा २०१५ मध्ये आलेल्या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रीया सरण, कमलेश सावंत, प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या कास्टकडे पाहिले तर कामत यांनी मराठी रंगभूमीवरील अनेक कलाकारांना यात स्थान दिले आणि एक उत्तम कलाकृती तयार झाली. कमी बजेटमध्ये उत्तम सिनेमा बनू शकतो याचे उत्तम उदाहरण त्यांनी यातून घालून दिले.
२०१६ मध्ये त्यांच्याकडे मदारी या चित्रपटाची कथा आली आणि या संधीचे निशीकांत कामत यांनी सोने केले. इरफान खानची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने लोकप्रियतेला गवसणी घातली. एका सृजनशील दिग्दर्शक म्हणून कामत यांची ख्याती वाढत गेली.
निशीकांत कामत यांनी मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची अनोखी छाप सोडली. ४०४ एरर नॉट फाऊंड, रॉकी हँडसम, फुगे, डॅडी, ज्यूली २ आणि भावेश जोशी या चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या.
डोंबिवली फास्टनंतर सुरू झालेला त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास थक्क करणारा आहे. यश त्यांच्यासोबत कायम राहिले. मराठी सिनेमाचा विचार करता २०१४ मध्ये आलेल्या लय भारी चित्रपटाने उत्तुंग यश मिळवले. रितेश देशमुख याचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. निशीकांत यांच्या दिग्दर्शनाने या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
निशीकांत यांना अजून प्रचंड काम करायचे होते. अनेक चित्रपट त्यांची प्रतीक्षा करीत होते. मात्र त्यांना पोटदुखीच्या आजाराने त्रस्त केले आणि त्यांना रुग्णालयाची पायरी चढावी लागली. गेल्या काही वर्षांपासून निशिकांतला लिव्हर सीरियॉसिसचा त्रास होता. हाच त्रास अचानक वाढल्याने त्याला तातडीचे उपचार करण्यासाठी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारा दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.