मुंबई - जम्मू आणि काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याची प्रक्रिया सरकारच्यावतीने सुरू आहे. यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अनेक ट्विट करीत आपली बाजू मांडली आहे.
अनुराग कश्यप यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''काश्मिरचे अनेक पैलू आहेत. सर्व योग्य आणि अयोग्य. ज्या प्रकारे हे घडलंय ते योग्य नाही इतके मी म्हणू शकतो.'', अशा प्रकारे अनुरागने आपले मत व्यक्त केलंय.
अनुराग यांनी या एका ट्विटवर न थांबता पुढील ट्विट करीत लिहिलंय, ''कलम ३७० आणि ३५ ए बद्दल जास्त सांगू शकत नाही. याची अंमलबजावणी, इतिहास किंवा वास्तव मला अजूनही समजलेले नाही. कधी वाटतं जायला पाहिजे होते, कधी वाटते का गेले. मी काश्मिरी मुसलमान नाही किंवा काश्मिरी पंडितही नाही. माझा काश्मिरी पंडित मित्र सांगतो काश्मिरची गोष्ट 'राशोमान' सारखी आहे.''
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने या आधीही एक ट्विट केले होते. त्यात लिहिले होते, ''तुम्हाला माहिती आहे का की, भीतीदायक गोष्ट काय आहे ? एका व्यक्तीला वाटते की, १२० कोटी लोकांसाठी योग्य काय आहे आणि त्याच्या जवळ अंमलबजावणी करण्याची ताकतही आहे.''
अनुराग नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सामाजिक मुद्द्यावर ते नेहमी आपली मते व्यक्त करीत असतात.