इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2003 मध्ये शस्त्रसंधी करार करण्यात आला होता, मात्र गेल्या कित्येक वर्षांत त्याचे तंतोतंत पालन झालेच नाही. नुकतेच दोन्ही देशांच्या लष्कराच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेश (डीजीएमओ) या अधिकाऱ्यांनी शस्त्रसंधीबाबतच्या सर्व करारांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर सहमती दर्शवली. यावर आज पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, यावेळी त्यांनी पुन्हा काश्मीरचा सुर आळवला आहे.
![Days after talks of ceasefire, peace; Pak PM Imran Khan rakes up Kashmir issue](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10802131_opaa.png)
नियंत्रण रेषेवरील (सीओसी) शस्त्रसंधीच्या पुनर्रचनेचे मी स्वागत करतो. पुढील प्रगतीसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारतावर आहे. यूएनएससीच्या संकल्पाप्रमाणे काश्मीरमधील नागरिकांच्या स्वतंत्र्यासाठी आणि त्यांच्या हक्काची पूर्ती करण्यासाठी भारताने आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असे ते म्हणाले.
पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला एक अभिमान आणि आत्मविश्वासू राष्ट्र म्हणून पाकिस्तानी सैन्याने योग्य प्रतिउत्तर दिले. या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. याबद्दल मी संपूर्ण देश आणि माझ्या सैन्याचे अभिनंदन करतो. आम्ही कैद केलेल्या पायलटला परत करत भारताच्या बेजबाबदार लष्करी अस्थिरतेसमोर पाकिस्तानची जबाबदार वृत्ती दर्शविली, असेही त्यांनी म्हटलं.
भारत-पाक शस्त्रसंधीचे अमेरिकेकडून स्वागत -
भारत पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीच्या सर्व नियम आणि करारांचे काटेकोरपणे पालन करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. संयुक्तरित्या पत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली. या कृतीचे अमेरिकेने कौतुक केले असून दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पसाकी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.