मुंबई - गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे किंवा एसटी बस सुविधा सुरू करून देण्यासाठी बरीच चर्चा झाली.आता गणेश उत्सव तोंडावर आला आहे, मात्र सरकारचे योग्य नियोजन नसल्याचा आरोप करत भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर ट्विटर वरून हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई असा खोचक निशाणा साधला आहे.
कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल्य या राज्यातील 'पाडून दाखवा सरकार'कडे आहे, असा चिमटा काढत भाजप नेते आशिष शेलार यांनी काढला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, कोकणात रेल्वे गाड्या सोडण्यावरुन सरकारचा गोंधळ सुरु आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला. आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण त्यांनी ऐकले नाही. एसटीही वेळेत दिली नाही. त्यामुळे अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले. आता चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायला हवी. मात्र त्याचे नियोजन सोडून या सरकारमधील मंत्री तू-तू -मै-मै करीत बसले आहेत, त्यामुळे सरकारचे मंत्री आहेत, की भांडखोर सासूबाई, अशी टीका शेलार यांनी केली.