मुंबई - ऐतिहासिक चित्रपट जरी चालत असले तरी सामाजिक चित्रपटांनाही तेवढीच मागणी आहे. नवयुगातील मावळ्यांवरील चित्रपट म्हणजे ‘हरिओम’. स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्म घेणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची ही कथा आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून पोस्टर पाहून हा एक अॅक्शनपट असल्याचे कळते. या पोस्टरवर भारदस्त शरीरयष्टी असलेल्या दोन तरुणांचा चेहरा दिसत असून या दोघांच्या डोळयांत स्वप्न पूर्ण करण्यासाठीची आग दिसत आहे.
भगवे वादळ निर्माण करणाऱ्या मावळ्यांवर आधारित श्रीहरी स्टुडीओज प्रस्तुत 'हरिओम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सध्या अनेक शिवकालीन चित्रपट प्रदर्शित होत असतानाच आता नव्या पिढीला प्रेरित करणारा 'हरिओम' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरिओम' चित्रपटात हरिओम घाडगे आणि गौरव कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात हरिओम घाडगे निर्माता, अभिनेता आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाबद्दल निर्माता,अभिनेते हरिओम घाडगे म्हणाला, “मी स्वतः कोकणचा पुत्र असल्याने या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे कोकणातील आहे. चित्रीकरणाची सुरुवातच तान्हाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावातून झाली आहे. त्यामुळे अॅक्शनबरोबरच कोकणातील निसर्गसौंदर्यही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा माझा पहिला मराठी चित्रपट असून नव्या पिढीला प्रेरित करणारा हा चित्रपट आहे. अनेक महिन्यांपासून 'हरिओम'च्या प्रदर्शनाची उत्सुकता होती अखेर आता 'हरिओम'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. महामारीच्या काळात अनेकांना रोजगार देण्याचे काम, काही सामाजिक उपक्रम या चित्रपटाच्या टीमच्या माध्यमातून राबवण्यात आले. आपण समाजाचे काही देणे लागलो, ही एकंच भावना यामागे होती. अथक प्रयत्नानंतर आता 'हरीओम' पूर्णत्वाला आला आहे. प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबियांसोबत हा चित्रपट चित्रपटगृहांत नक्की पाहा.''
‘हरिओम' येत्या १० जून रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - कानांना सुख देणारा 'लाल सिंग चड्ढा'मधील 'मैं की करां?' ट्रॅक रिलीज